वाठोडा बू. (प्रतिनिधी) – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ग्रामजयंती महोत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. “त्यांचा वाढदिवस म्हणजे गावाचा वाढदिवस” या भावनेतून ग्रामस्थांनी एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
यावेळी सामुदायिक प्रार्थना, भजन, कीर्तन व आरतीमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरलेला महाप्रसाद गावातील लोकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. गावातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्वांनी एकत्र येत सेवा भावनेतून सहभाग नोंदविल्याने सामाजिक एकात्मतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवकांनी तन, मन, धनाने सहकार्य केले. त्यांच्या पुढाकारामुळे महोत्सव अधिकच संस्मरणीय ठरला. ग्रामजयंती महोत्सवामुळे गावात समता, बंधुभाव व सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.












