अमरावती, दि. 11 (जिमाका): राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या मासिक अनुदानात हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा 2 हजार 500 रुपये अनुदान थेट बँक खात्यात मिळणार आहे. मात्र, या वाढीव लाभाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन युडीआयडी कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेतील 21 हजार 359 आणि श्रावणबाळ योजनेतील 1 हजार 913 अशा एकूण 23 हजार 272 लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड अद्याप आधारशी संलग्न नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही दिव्यांग लाभार्थी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये, यासाठी लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स संबंधित गावातील तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात 20 मार्च 2026 पूर्वी जमा करावे. तसेच, लाभार्थ्यांनी स्वतःहून युडीआयडी पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अनुदानात अडचणी येऊ शकतात, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.












