धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्राम तळेगाव दशासर येथे २५/१५ व १५ वा वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निधीतून करण्यात आलेली अनेक कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून काही कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने साहित्य वापरण्यात आल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील रस्ते व इतर विकासकामे दर्जाहीन झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देत संबंधित कामांची चौकशी करून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांनाही यासंदर्भात लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.


दरम्यान, जिल्हा परिषद उपविभाग चांदूर रेल्वे येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामांची पाहणी केली असता, कामांमध्ये अनियमितता झाल्याचे त्यांनीही मान्य केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या सर्व प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित रस्ते व कामांची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तळेगाव दशासर येथील नागरिकांनी दिला आहे.












