निम्न पेढी प्रकल्प बाधीतांना 101 कोटीचे सानुग्रह अनुदान मंजूर. पहिला टप्प्यात 57.50 कोटी रुपये प्राप्त – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या निम्न पेढी प्रकल्पातील बाधितांना 101 कोटींचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यात 57 कोटी 50 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप होणार लवकरच होणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे.
निम्न पेढी प्रकल्पातील पाच गावांच्या पुनर्वसनाला गती देण्यात आली आहे. या गावातील नागरिकांना हेक्टरी पाच लाख रुपये सानुग्रह निधी मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आंदोलने झाली. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी दखल घेत तातडीने याबाबत बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सहमतीने निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान मंजूर करून प्रकल्पाची वाट मोकळी करून दिली आहे.
सानुग्रह निधी 5 गावातील 845 लाभार्थ्यांना मिळणार आहे. सध्या या प्रकल्पाला 101 कोटी रुपये मंजूर झाले असून 57.50 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला आहे. निम्न पेढी प्रकल्पांतर्गत 2006-13 या कालावधीत सरळ खरेदी प्रक्रियेत एकूण 1 हजार 981 हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली आहे. संपादित शेतजमीनीकरीता पाच लाख रूपये प्रति एकर सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली. याबाबत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने यासंदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या. या बैठकीदरम्यान निम्न पेढी प्रकल्पात सुमारे 101 कोटी रूपयांचा सानुग्रह निधी प्राप्त झाला आहे. प्रथम टप्प्यात प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील हातुर्णा, अळनगाव, गोपगव्हाण, कुंड खुर्द व कुंड सर्जापूर या 5 पुनर्वसित गावासाठी 57.50 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे आता निम्न पेढी प्रकल्पाला गती येणार आहे.
अमरावती, भातकुली व मूर्तिजापूर तालुक्यातील गावांना निम्न पेढी प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पात सुमो 3 हजार 200 हेक्टर क्षेत्र बुडीत राहणार आहे. या प्रकल्पामुळे 3 तालुक्यासह जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भातकुली तालुक्यातील पाणीटंचाई दूर होऊन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, तसेच भाजीपाला पिकांना फायदा होणार आहे.
सानुग्रह निधीपोटी मिळालेला 57.50 कोटी रूपयांचा निधी प्रशासकीय बाबी पूर्ण करून वितरीत करण्यात येणार आहे. सदर निधी पालकमंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने प्राप्त झाला आहे. सानुग्रह अनुदान वितरीत करण्याची कारवाई जलसंपदा विभागातर्फे करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी तातडीने पुनर्वसीत गावात स्थलांतरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय तंत्रनिकेतनच्या 267 विद्यार्थ्यांना रोजगार. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध
अमरावती, दि. 16 (जिमाका): अमरावती शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. उत्कृष्ट अध्यापन आणि इतर सोयी सुविधांमुळे गेल्या 2024-25 या वर्षात उत्तीर्ण झालेल्या 267 विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीत रोजगार मिळाला आहे.
अमरावती शासकीय तंत्रनिकेतन अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1955मध्ये झाली आहे. तसेच संस्थेला 1995मध्ये शैक्षणिक स्वायत्तता लाभली आहे. संस्थेत स्थापत्य, यंत्र, विद्युत, अणू विद्युत, संगणक, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र, प्लास्टिक पॉलिमर, रसायन या 9 विद्याशाखा असून त्यापैकी 6 एनबीए नामांकन प्राप्त आहेत.
संस्थेचा 62 एकराचा परिसर असून इमारती, प्रशस्त क्रीडांगणे, तसेच अद्ययावत पुस्तकांनी परिपूर्ण असे सुसज्ज ग्रंथालय आहे. प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणे, यंत्रसामुग्री, रसायने यांनी परिपूर्ण आहेत. संस्थेत उच्चविद्या विभूषित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे. तसेच मुलांसाठी एक आणि विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृह, इंटरनेट व इतर सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असून दरवर्षी दर्जेदार कंपनीमध्ये मुलाखतीद्वारे बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज दिल्या जाते. 2024-25 या शैक्षणिक वर्षांत आता पर्यंत एकूण 267 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीमध्ये निवड होण्याची संधी मिळते. तसेच संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व मार्गदर्शन आणि रोजगार संधी उपलब्ध व्हावी म्हणून कार्यक्षम प्रशिक्षण व आस्थापना विभाग उपलब्ध आहे. संस्थेत नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटना सक्रीय आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विविध नामांकीत कंपन्यांमध्ये वरीष्ठ पदावर कार्यरत माजी विद्यार्थीसुद्धा संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांच्या आर्थिक विकासासाठी मोलाचे सहकार्य करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पाठ्यक्रम संस्थेत लागू केला आहे. द्विभाषिक शिक्षण प्रणाली अवलंब केली आहे.
तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प शुल्क आकारून शिक्षण पूर्ण करण्याची संधी तसेच शिक्षण व परीक्षा शुल्क सवलत दिली जाते. गरीब व पात्र विद्यार्थ्यांसाठी संस्थेकडून ‘नैवेद्य निधी’ योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. भारत सरकार आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मुलींना 100 टक्के शुल्क माफ केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय सुविधा संस्थेत उपलब्ध आहेत. राज्य शासनाने संस्थेला नुकतेच सेंटर ऑफ एक्सलन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्रीडी प्रिंटिंग या सुविधा दिली आहे. याचा संस्थेतील सर्व विभागातील विद्यार्थी उपयोग घेत आहेत. नवीन तंत्रज्ञानावर विकसित असलेले सर्व मॉडेल्स वापरून विद्यार्थी नवीन प्रोजेक्ट तयार करत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील.
राज्य शासनाच्या सीईटी सेलद्वारे नवीन 200 संगणक असलेले सुसज्ज असे दोन संगणक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आभासी पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून ई-बुक्सद्वारे अभ्यास साहित्य डाऊनलोड करता येते. तसेच संस्था आणि विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येतात.
जिल्हा नियोजन समितीमधून संस्थेच्या सर्व विभागांना 22 स्मार्ट क्लासरूम देण्यात आले आहे. याचा फायदा प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना शिकवणी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी होत आहे. मेडा कडून 140 केव्ही सौर ऊर्जा रूफ टॉप पॅनल विकसित करण्यात येत आहे. अद्ययावत सोयी सुविधा, दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली शिक्षण प्रणालीयुक्त असलेली शासकीय तंत्र निकेतन ही संस्था उत्कृष्ट अभियंता व औषधंनिर्माणशास्त्रज्ञ घडविण्यात अग्रेसर आहे. तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बोराडे यांनी केले आहे.
कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 17 जून 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मशिदीजवळ, डेपो रोड, अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा [email protected] या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.