अमरावती, दि. १२ : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा (मुंबई) यांच्या अंदाजानुसार अमरावती विभागातील काही जिल्ह्यांमध्ये १५ व १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अमरावती विभागातील अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच बुलढाणा व अकोला जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशी माहिती कृषी अधिक्षक अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची कापणी, खत व कीटकनाशक फवारणी यांसारखी कामे करताना हवामान अंदाजाचा विचार करून नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. परिपक्व झालेल्या पिकांची कापणी तात्काळ करावी तसेच कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, असेही सूचित करण्यात आले आहे.
तसेच वादळी वाऱ्यामुळे काम करताना शेतकऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शक्य असल्यास शेतातील कामे टाळावीत व शेतातील पाळीव प्राण्यांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.
०००००
—












