वीर नायक अपडेट !

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

अमरावती, दि. 26 (जिमाका): श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. खासदार बळवंत वानखडे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय आचलिया, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यावेळी उपस्थित होते.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, मी ‘डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ’चा विद्यार्थी आहे. न्यायिक शिक्षणाबाबत मला महाविद्यालयाकडून बाळकडू मिळाले. मी या महाविद्यालयाच्या ऋणी आहे. येत्या काळातही माझ्या हातून संविधानाच्या चौकटीत राहून न्यायदानाचे कार्य सुरू राहील व यातून देशाची सेवा करीत राहील.

न्यायदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाने सदसद विवेक बुद्धीने न्यायदानाचे कार्य करावे. येथील विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात वंचितांना न्याय मिळवून देण्याची आपल्या पदाचा उपयोग करावा. हा सत्कार सोहळा माझ्या महाविद्यालयात होत असल्यामुळे मला हा कौटुंबिक सोहळा वाटत असल्याचे ते यावेळी म्हणाले उच्च न्यायालयाचे न्या. श्री. आचलिया,तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेच्या वतीने सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य वर्षा देशमुख यांनी तर आभार प्राची कडू यांनी मानले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि.26 (जिमाका) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आणीबाणीच्या काळातील घटनांवर आधारित प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा. जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : देशात 25 जून 1975 रोजी लागू झालेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या काळातील आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला त्या काळातील घटनांचा इतिहास आणि लोकशाहीच्या संरक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. आणीबाणीच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आणीबाणीशी संबंधित विविध घटना, घडामोडी, त्या काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या मान्यवरांची छायाचित्रे, तसेच संक्षिप्त माहितीपूर्ण मजकूर आणि माहिती फलकांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

veer nayak

Google Ad