अमरावती – पेट्रोल नाही म्हणून चक्क विमान रद्द करण्याची नामुष्की अमरावती विमानतळ प्रशासनावर ओढवली. सोमवारी दुपारी चार वाजता उडणारं विमान पेट्रोल नसल्यामुळे विमानतळावरच उभं असून प्रवासी मात्र अशा व्यवस्थेमुळं बेजार झालेत.
सोमवारी सायंकाळी एकूण ७४ आसनी विमानात सर्व ७४ प्रवासी विमानतळावरील सर्व सोपस्कर पूर्ण करून विमानात बसले. आता विमान आकाशात झेप घेईल याची वाट पहून थकलेले असताना अचानक पायलट कॉकपिट बाहेर आला आणि पेट्रोलचा टँकर चिखलात अडकल्यानं पेट्रोल मिळालं नाही म्हणून विमान उडणार नाही असं प्रवाशांना सांगून त्यानं माफी मागितली. पायलटचं हे वाक्य ऐकून आकाशात उडण्यासाठी सज्ज झालेल्या प्रवाशांच्या पायाखालची जमीन सरकली.
प्रवाशांचा रोष
पेट्रोल नाही मग विमानसेवा गंमत म्हणून सुरू केली का, अशा शब्दात प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. ज्यांना महत्वाच्या कामानिमित्त मुंबईत पोचायचं होतं ते प्रचंड चिडले. विमानतळावर रात्री राहण्याची सुविधा नसल्यानं अनेकजण घरी परतले. जे अमरावती व्यक्तिरिक्त चांदूरबाजार, अचलपूर या तालुक्यातून आले होते, त्यांना अमरावतीत हॉटेलमध्ये मुक्कामी राहावं लागलं. सोमवारी रद्द झालेलं विमान आज सकाळी झेप घेईल असं सांगण्यात आल्यानं प्रवासी सकाळी सात वाजल्यापासून विमानतळावर पोचले. मात्र त्यांना दुपारी एक वाजता, विमान चार वाजता उडेल असं सांगण्यात आलं. या सर्व प्रकारामुळं प्रवासी प्रचंड वैतागले.
कोणीही बोलायला तयार नाही
अमावती विमानतळावर हा सगळा गोंधळ सुरू असताना पत्रकारांना विमानतळ परिसरात जाण्यास बंदी केली. पेट्रोलचा टँकर चिखलात अडकल्यामुळं विमान रद्द झालं, इतकीच माहिती बाहेर येत आहे. विमानतळावरील अधिकारी कर्मचारी या गोंदळाबाबत मूग गिळून गप्प आहेत.आम्ही सकाळपासून आमच्या गावावरून अमरावती शहराबाहेर असणाऱ्या बेलोरा इथे विमानतळावर आलो. पेट्रोलचा टँकर आला नाही असं सांगून विमान रद्द झालं. रात्र अमरावतीत नातेवाईकांकडे काढली. आता पुन्हा विमानतळावर आलो. मात्र चार वाजल्याशिवाय विमान उडणार नाही असं सांगत आहेत. प्रवासी अनावर येऊ नये म्हणून काही प्रवासी इकडे आणि काही प्रवासी दुसऱ्या बाजूला ठेवले आहेत. अनेकजण याठिकाणी वाद घालत आहेत. आता काय करावं कळत नाही असं एका वृद्ध प्रवाशांनं भ्रमणध्वनी द्वारे बोलताना सांगितलं.