चांदूर रेल्वे : रेल्वे स्टेशन ते आझाद चौक दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून,खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेली गिट्टी व चुरी नागरिकांसाठी अपघाताचे कारण ठरत आहे.या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, विशेषतः शाळकरी मुलांना सायकल चालवणे अवघड झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे बुजविण्यासाठी केवळ चुरी व गिट्टी टाकण्यात आली. मात्र ही सामग्री रस्त्याच्या बाहेर येत असल्याने दुचाकीस्वार, सायकलस्वार व पादचाऱ्यांना गंभीर दुखापती होत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात अध्यक्ष पांडूरंग डोगरे, शहर अध्यक्ष गणेश राय आणि तालुकाध्यक्ष विनोद काळमेघ यांनी उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग, चांदूर रेल्वे यांना लेखी निवेदन सादर केले आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच रेल्वे स्टेशनपासून कुन्हा रोडपर्यंतच्या मार्गावर किमान १०० निंबाची झाडे वाळलेली असून, ती कधीही कोसळून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतात. वाऱ्यामुळे ही झाडे पडण्याची शक्यता अधिक असून, यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने या दोन्ही गंभीर बाबींची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश राय पांडुरंग डोंगरे विनोद काळमेघ सह अनेक कार्यकर्ते हजर होते.














